काँग्रेस-राष्ट्रवादीने विश्वासघात केला : राजेंद्र कोरडे
शेकापच्या बळावरच ९६ आमदार निवडून आल्याचा दावा
सांगोला / एच.नाना : राज्यातील छोट्या प्रागतिक पक्षांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला केलेल्या सहकार्यामुळेच या पक्षाचे 96 आमदार निवडून येऊ शकले. यामुळेच महाविकास आघाडीची सत्ता स्थापनेची गणित जुळली ही वस्तुस्थिती आहे. परंतु महाविकास आघाडी सरकारने प्रागतिक पक्षांना विचारात न घेता कारभार करीत आहे. केंद्र सरकारने संमत केलेल्या शेतकरी विरोधी कृषी कायद्याबाबत या सरकारची भूमिका शेतकरी आंदोलनाचा विश्वासघात करणारी आहे असे मत शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयीन चिटणीस अँड. राजेंद्र कोरडे यांनी केले.
सांगोला येथे 25 व 26 सप्टेंबर रोजी होणाऱ्या शेकापच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीसाठी अँड. राजेंद्र कोरडे हे सांगोला मध्ये आले आहेत. सांगोला येथे सहकारी शेतकरी सूतगिरणी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षाची भूमिका मांडली.

2019 च्या लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय क्षेत्रात अनेक उलटसुलट घडामोडी घडल्या आहेत. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची महाविकास आघाडी सरकार स्थापन झाली. सत्तांध, धर्मांध आणि जात्यांध अशा जनविरोधी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे उद्दिष्टे यशस्वी झाले खरे परंतु राज्यातील छोट्या प्रागतिक पक्षांनी महाविकास आघाडी सरकारला केलेल्या सहकार्याची जाणीव राहिली नाही. राज्यातील हे सरकार प्रागतिक पक्षांना विचारात न घेता कारभार करीत आहे. केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी कायद्याबाबत या सरकारची भूमिका शेतकरी आंदोलनाचा विश्वासघात करणारी आहे.
केंद्र सरकारची धोरणे ही शेतकरी व कामगार विरोधी आहेत. या सरकारमुळेच महागाई, बेरोजगारी वाढली आहे. अनेक उद्योग मोडीत काढून ते खाजगी उद्योग समूहांना कवडीमोल किमतीत विकण्याचा सपाटा लावला आहे. केंद्र सरकारने संमत केलेल्या शेतकरी विरोधी कृषी कायद्याच्या विरोधात 27 सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘भारत बंद’ यशस्वी करण्यासाठी आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देत असून ते यशस्वी करण्यासाठी प्रयत्नही करणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तालुक्यातील कार्यकारिणी युती व आघाडीबाबत चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल असेही कोरडे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेसाठी सांगोला तालुक्यातील शेकापचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



