सांगोल्यात २७ हजार हेक्टर वरील पिके जळू लागली
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; बळीराजाचे लक्ष पावसाकडे

सांगोला/डॉ. नाना हालंगडे
तालुक्यात सध्या सुसाट वाहणाऱ्या वा-याबरोबर आकाशात ढगाळ वातावरणात कधी ऊन तर कधी सावली असा निसार्गाचा खेळ सुरू असताना पावसाअभावी सुमारे २७ हजार १४५ हेक्टर क्षेत्रावरील पेरणी झालेली बाजरी, मका आदी खरीप पिके जळू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे दमदार पावसासाठी आकाशाकडे लागले आहेत. दरम्यान यंदा जून महिन्यात पावसाने निराशाच केली असून मे महिन्यातील अवकाळी पावसाचा चालू मृग, आर्द्रा व पुनर्वसू नक्षत्रावर परिणाम झाल्याचे जाणकार शेतकरी सांगत आहेत.
यंदा मे महिन्यात सलग १८ दिवस २१९ मिमी बिगर मौसमी दमदार अवकाळी पाऊस पडला आणि सर्वांचेच अंदाज फोल ठरवले. ऐन उन्हाळ्यात मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाल्यामुळे मे महिन्यातील उन्हाळा फारसा जाणवलाच नाही.
कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार खरीप हंगाम पेरणीच्या दुप्पट पाऊस यंदा सांगोला तालुक्यात पडला आहे. वास्तविक आपल्याकडे जून महिन्यात -७५-१०० मिमी पीक पेरणी योग्य पाऊस पडल्यानंतर शेतकरी पेरणीसाठी चाड्यावर मूठ धरतो यंदा मात्र शेतकऱ्यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यातच खरीप पेरणीला सुरुवात केल्याने खरीप हंगामाची पेरणी नियोजित वेळेत पूर्ण होणार असल्याचे संकेत मिळाले होते. दरम्यान सांगोला तालुक्यात ८ जुलै पर्यंत शेतकऱ्यांनी ३० हजार ६४८.८४ हेक्टरपैकी सुमारे २७ हजार १४५ हेक्टर क्षेत्रावर ( ९० टक्के) पेरणी उरकून घेतली आहे. तर शेतकऱ्यांनी बाजरी पेक्षा मका पेरणीलाच जास्त प्राधान्य दिल्याने एकूण ९ हजार ८३४.४० हेक्टरपैकी १६ हजार ५६७ हेक्टर क्षेत्रावर (१४० टक्के) अधिक पेरणी केली आहे.
यंदा बाजरीचे हेक्टरी क्षेत्र घटले असून अवघी ५० टक्के पेरणी झाली आहे. पेरणी झालेल्या बाजरी मका आदी पिकांची चांगल्या प्रकारे उगवण झाली असली तरी मृग, आद्रा नक्षत्रातील अपेक्षेप्रमाणे पावसाने पाठ फिरवल्याने बाजरी मका आदी खरीप पिके पाण्याअभावी जळू लागल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहेत.
सांगोला तालुक्यात २७ हजार १४५ हेक्टरवर खरीप
सांगोला तालुक्यात ८ जुलै पर्यंत खरीप हंगाम पीक निहाय पेरणी पुढील प्रमाणे. -बाजरी -१७ हजार ६७२ हेक्टर पैकी ७ हजार ८१२ हेक्टर ,मका- ९ हजार ८३४ हेक्टर पैकी १६ हजार ५६७ हेक्टर तसेच तूर- ६६४ हेक्टर पैकी ७२३ हेक्टर, उडीद- ३१८ हेक्टर पैकी ४२० हेक्टर ,मुग-१८० हेक्टर पैकी ११२ हेक्टर , भुईमूग- २८६ हेक्टर पैकी २५७ हेक्टर ,सुर्यफूल- १५२० हेक्टर पैकी ५३५ हेक्टर,ऊस आडसाली ६२० हेक्टर इतर कडधान्य – १ हजार हेक्टर अशी एकूण सुमारे २७ हजार १४५ हेक्टर क्षेत्रावर ( ९० टक्के) पेरणी झाली आहे.
खरीप हंगाम वाया जाण्याची भीती
सांगोला तालुक्यातील खरीप बाजरी,मका आधी पिकांची चांगल्या प्रकारे उगवण झाली आहे. तसा पेरणीचा अहवाल जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे पाठवला आहे.सध्या पावसा अभावी विशेषता जिराईत क्षेत्रातील पिके जळू लागल्याचे चित्र दिसून येत आहे.येत्या आठवड्यात पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे.



